Monday, October 17, 2016

अंधश्रद्धा निर्मूलन





     अंधश्रद्धा निर्मुलन समिती व तत्सम संघटनानी चालवलेली विवेकवादाची चळवळ निश्चितच प्रशंसनीय आहे. त्याचा काही प्रमाणात तरी परिणाम होत असणारच.
     सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, की समजत्या वयापासूनच देव या  संकल्पनेवर माझा अजिबात विश्वास नाही.पुनर्जन्म, प्रारब्ध- संचित - क्रियमाण, पाप-पुण्य, रूढी-परंपरांचे अवडंबर या कल्पना मला मान्य नाहीत. धर्म व ईश्वर या संकल्पना कालबाह्य झाल्या आहेत यावर मी ठाम आहे. ज्योतिष हे शास्त्र नाही, चमत्कार घडू शकत नाहीत, बुवा, बापू वगैरे फसवेगिरी आहे... हेच सत्य आहे.
पण.....
     हे सर्व तात्त्विक दृष्ट्या , बौध्दिक दृष्ट्या, वैचारिक पातळीवर व तर्कानुसार सत्य आहे. परंतु दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या माणसाला “ब्रह्म हेच सत्य आहे आणि जग मिथ्या आहे” हे सांगण्यात जसा अर्थ नसतो तसेच त्याला “देव आणि धर्म ह्या कालबाह्य गोष्टी आहेत” असं सांगण्यातही अर्थ नसतो. एका विचारवंताचे (बहुधा फ्रांझ काफ्का) वाक्य निश्चितच विचार करण्यासारखे आहे. तो म्हणतो “ देव नाही हे मला मान्य आहे पण त्याची आवश्यकता आहे हे देखील मला मान्य आहे..”
आपण भारतापुरता विचार करू....
भारतातील ९९.९९% जनता एकतर अशिक्षित आहे किंवा सुशिक्षित अडाणी आहे. परंपरेचा भयंकर पगडा आहे. देवाची आराधना करण्याची तीन मुख्य कारणे मला जाणवली
 १) आपल्या आवाक्याबाहेरचे काहीतरी मिळावे म्हणून..
 जे आपल्या आवाक्यात आहे त्यासाठी कुणीही देवाची प्रार्थना करत नाही. नोकरी करणारा माणूस पगार मिळावा   म्हणून देवाला साकडं घालत नाही.
 २) भीती
पूजा नाही केली किंवा देवळात नाही गेलो तर देव कोपेल या भीतीने देवाला भजणारे.
 आणि ३) पुण्य जमा करण्यासाठी .
पापं तर घडतच असतात त्यामुळे पापक्षालनासाठी पुण्यसंचय हवाच. म्हणजे debit -credit चा ताळमेळ साधेल.
मला तर देव ही संकल्पना आणि पूजा-पाठ , यज्ञ याग, कुणाची तरी शांती, उपासना वगैरे गोष्टी निर्माण करणा-या लोकांच्या बुद्धीचे खरंच कौतक वाटतं. माणसाच्या मर्यादा, त्याची बौद्धिक-मानसिक कुवत ओळखून जाणीवपूर्वक अशा गोष्टी निर्माण केल्या असाव्यात असं वाटतं. कारण मनुष्य अतिशय चंचल आणि गोंधळलेला असतो. त्याला कशात तरी गुंतवून ठेवायला हवे. आणखी एक महत्वाची गोष्ट.. मनुष्य हा मूलत: हिंस्त्र आणि स्वैराचारी आहे. कुटुंब संस्था आणि  देव नामक अदृष्य शक्तीची भीती, यामुळे तो ब-याच प्रमाणात सरळ वागतो.. (आजकाल तर कायद्याची भीती उरलीच नाही.)
माणसाला कुठच्याही गोष्टीची जबाबदारी नको असते. म्हणून आपल्या अपयशाचे, किंवा सीमित क्षमतेचे खापर     “ देवाची इच्छा”, गेल्या जन्मीच्या पापाचे फळ,  किंवा “नशीब” अशा गोष्टींवर टाकून मोकळा होतो.
माणूस अनेक समस्यांनी ग्रासलेला असतो. ९९.९९% माणसांची वैचारिक पातळी विवेकवाद झेपण्याएवढी नसते. काही तर भाबडे असतात. त्यांना आधार हवा असतो.  माणसांवर विश्वास नसतो. मग तो सर्वशक्तिमान, कृपाळू, दयावंत वगैरे असलेल्या परमेश्वराला  वेठीस धरतो. काम झालच तर देवाची कृपा आणि नाही झालं तर आपलं नशीब.. एवढे सोपे गणित असते.
अशा परिस्थितीत विवेकवादासारखे कडू औषध पचनी पडणं कठीणच आहे. फरक निश्चित पडतोय. अमेरिकेतील २३% लोकांनी धर्म नाकारलाय. विचारांमध्ये बदल होतोय याचं हे लक्षण आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करता विवेकवाद जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे यात शंकाच नाही.
.......... अजित पाटणकर
       डोंबिवली.


No comments:

Post a Comment